नवीन पोस्ट्सबातम्याराजकारणसामाजिक

कथा धनुष्यबाणाची !

शिवसेनेने त्रिशुल या चिन्हासोबत उगवता सुर्य व मशाल ही चिन्हे का निवडली? याला कारण सेनेला यापुर्वी वामनराव महाडीक व छगन भुजबळ यांच्या रुपाने या दोन चिन्हावर यश मिळून त्यांचे हे दोन शिलेदार विधानसभेत पोचले होते. शिवसेना 1966 मध्ये स्थापन झाली असली तरी सन 1968 साली पक्षाची राजकीय संघटना म्हणून नोंद करण्यात आली. त्याच दरम्यान परळचे कम्युनिस्ट आमदार कॉ. कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर 1970 मध्ये पोटनिवडणूक लागली होती. पोटनिवडणुकीत डाव्या पक्षांनी कॉ. कृष्णा देसाईंच्या पत्नीलाच म्हणजे सरोजिनी देसाईंना उमेदवारी दिली. तर बाळासाहेबांनी परळचे नगरसेवक वामनराव महाडिक यांना उमेदवारी दिली. त्याकाळात डाव्या विचारांच्या संघटनांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली होती.

आमदारांना खासदारांना पगार पेन्शन कशाला हवी आहे ?

निवडणूक लढवायची तर पक्षाला चिन्हं पाहिजे होतं. डरकाळी फोडणारा वाघ ही सेनेची ओळख होती मात्र सन 1968 सालच्या निवडणूक चिन्हं (आरक्षण व वाटप) आदेश या कायद्यानुसार चिन्ह म्हणून पशू-पक्षी किंवा माणूस ही चिन्ह म्हणून वापरता येणार नव्हती. त्यामुळे या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या वामनरावांचं चिन्ह होतं उगवता सूर्य. त्यांच्या विजयामुळे शिवसेना नावाच्या पक्षाचा पहिला आमदार सभेत पोचला होता.

छगन भुजबळांनी 1985 मध्ये सेनेतर्फे विधानसभा निवडणूक लढवली. त्यांनी मशाल या चिन्हावर ही निवडणूक लढवली. त्यांनाही यश आले. मात्र आयोगाच्या निकषानुसार अपेक्षित असलेला मतांचा कोटा व आमदार व खासदार निवडून येत नसल्याने त्यांना निवडणूक आयोगाकडून अधिकृत चिन्ह देण्यात येत नव्हतं. म्हणूनच शिवसेनेचे उमेदवार वेगवेगळ्या निवडणुकांना वेगवेगळी चिन्हे मतदारांना सामोरे गेले. सेनेने 1989 च्या निवडणुकीत मात्र धनुष्यबाण हे चिन्ह वापरल होत. सेनेने 1989 मध्ये भाजपसोबत युती स्थापन करण्यापुर्वी हा पक्ष नोंदणीकृत नव्हता. 1989 च्या लोकसभा निवडणूका सेनेने भाजपसोबत लढवल्या व त्यांचा 1 खासदार लोकसभेत निवडून आला. सोबत त्यांना राज्य पक्ष म्हणून नोंदणी होण्यासाठी चार टक्के मतांचा कोटा देखील मिळाला होता.

खरच आपल्या न्यायदेवतेने पट्टी बांधली आहे का ?

अशा रितीने पक्षाला धनुष्य बाण हे चिन्ह अधिकृतपणे मिळण्यासाठी 1989 ची वाट पाहावी लागली. सेनेने या निवडणुका धनुष्य बाण या चिन्हावर लढवल्या होत्या मात्र ते चिन्ह त्यांच्यासाठी राखीव झाले नव्हते. निवडणूक चिन्ह म्हणून धनुष्य बाण राखीव होण्यासाठी शिवसेनेकडे पक्षाची घटना नव्हती. ह्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे ह्यांनी ओबेराय हॉटेल मध्ये जाऊन लगेच निर्वाचन आयुक्त टी. एन शेषन्‌ ह्यांची भेट घेतली. शेषन्‌ म्हणाले, ‘त्यात काय एवढं? वकिलाला सांगून घटना तयार करून घ्या आणि माझ्या कार्यालयाला सादर करा! ‘झाले. बाळासाहेबांनी शिवसेनेची घटना तयार करवून घेतली आणि निर्वाचन आयोगाला सादर केली! त्यामुळे शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह कायमचे मिळाले! अशी ही धनुष्यबाणाची कथा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button